त्र्यंबकेश्वर येथे “उन्नत नाशिक अभियान” लोगोचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण

त्र्यंबकेश्वर येथे “उन्नत नाशिक अभियान” लोगोचे मा. मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनावरण
नाशिक महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या “उन्नत नाशिक अभियान” (स्वच्छ नाशिक | सुंदर नाशिक | हरित नाशिक) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या लोगोचे अनावरण आज दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी श्री स्वामी समर्थ गुरुकुल, त्र्यंबकेश्वर येथे मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते संपन्न झाले.
या अभियानाचा कालावधी दिनांक २२ एप्रिल २०२६ (वसुंधरा दिन) ते २२ एप्रिल २०३० असा असून, शहराचा सर्वांगीण, शाश्वत व नागरिक-केंद्रित विकास साधणे हा मुख्य उद्देश आहे. अभियानांतर्गत रेनवॉटर हार्वेस्टिंग, सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण, वृक्षारोपण व संगोपन, Garbage Vulnerable Points (GVP) निर्मूलन, १००% कचरा वर्गीकरण, प्लास्टिकमुक्त क्षेत्र निर्मिती तसेच नागरिक सहभाग वाढविणे यावर विशेष भर देण्यात येणार आहे.
तसेच, अभियानातील “भूप्रहरी” ही संकल्पना महत्त्वपूर्ण असून, स्वयंसेवकांच्या माध्यमातून स्वच्छता व पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्यात येणार आहे.
यावेळी अभियानाचे संकल्पक कुंभमेळा मंत्री नामदार गिरीश महाजन, नामदार राधाकृष्ण विखे पाटील, नामदार छगन भुजबळ, नामदार रवींद्र चव्हाण, तसेच गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, आमदार देवयानीताई फरांदे, सीमाताई हिरे, डॉ. राहुल आहेर, दिलीप बनकर,आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, हिरामण खोसकर मा. महापौर सौ. हिमगौरी आडके, मा. उपमहापौर श्री. विलास अण्णा शिंदे, मा. स्थायी समिती सभापती श्री. मच्छिंद्र सानप, भाजप गटनेते श्याम बडोदे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, शिवसेना (उ.बा.ठा.) गटनेते केशव पोरजे, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेत्या सीमाताई ठाकरे ,नगरसेवक सुरेश अण्णा पाटील,चंद्रकांत खोडे,नितिन निगळ तसेच अतिरिक्त आयुक्त अमित रंजन,डॉ. आवेश पलोड (घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक), नामदार गिरीश महाजन यांचे ओएसडी संदीप जाधव, अधिकारी व पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
28 एप्रिल पर्यंत भूप्रहरी स्वयंसेवकांनी या अभियानात सहभागी होण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करून आपली माहिती भरून द्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.
तसेच मुख्यमंत्री महोदयांनी या अभिनव उपक्रमाला शुभेच्छा दिल्या असून लोकसहभागातून होणाऱ्या उपक्रमासाठी सर्वसमावेशक प्रयत्न झाल्यास नक्कीच नाशिकच्या शाश्वत विकास अधिक गतीने होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.
नाशिक महानगरपालिकेमार्फत सर्व नागरिकांना या अभियानात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत असून, “उन्नत नाशिक अभियान” यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे.


