क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन.
*क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कृतज्ञतापूर्वक अभिवादन*
*क्रांतीसूर्य महात्मा फुले यांनी देशात स्वातंत्र्य, समता व बंधुतेची बीजे रोवली – मंत्री छगन भुजबळ*
*आद्यसमाज सुधारक महात्मा फुले यांच्याकडून बहुजन समाजाला जागृत करत मुख्य प्रवाहात आणण्याचे अलौकिक कार्य – मंत्री छगन भुजबळ*
*नाशिक,येवला,दि.११ एप्रिल :-* आद्यसमाज सुधारक, सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा जोतीराव फुले यांनी बहुजन समाजाला ज्ञानाचा प्रकाश दाखवून वैचारिक गुलामगिरीतून मुक्त केलं. स्वातंत्र्य, समता व बंधुतेची बीजे रोवत देशात सामाजिक क्रांती घडवून आणली असे सांगत राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्या १९५ व्या जयंतीनिमित्त कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
आद्यसमाज सुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांची आज १९५ वी जयंती साजरी होत आहे. त्यानिमित्ताने येवला येथील महात्मा फुले नाट्यगृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, ज्येष्ठ नेते आंबदास बनकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, मायावती पगारे, येवला बाजार समिती प्रशासक सभापती वसंत पवार, नगरसेवक दिपक लोणारी, अडतीसगाव पाणी पुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर, संतोष खैरनार, सुभाष गांगुर्डे, भाऊसाहेब धनवटे, गोटू मांजरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले की, महात्मा फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. देशात अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरांवर हल्ला करुन प्रबोधनाची चळवळ उभारली. शेतकरी, कष्टकरी, महिला व उपेक्षित बांधवांना हक्कांची जाणीव करुन देत लढण्याचं बळ दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून शिवजयंती उत्सवाची सुरुवात केली. देशाला पुढे नेणारा, सामाजिक क्रांती घडवणारा विज्ञानवादी, सत्यशोधक विचार त्यांनी दिला असल्याचे सांगितले.
ते म्हणाले की, समाजातील पिडीत आणि वंचित घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महात्मा फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. देशात स्वातंत्र, समता व बंधुता याचे बीज समाजात रोवले. त्यामुळे देशात मोठी सामाजिक क्रांती झाली. त्यांचे विचार अविरत रुजविण्याचा निर्धार त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण करूया असे आवाहन त्यांनी केले. तसेच महात्मा फुले यांच्या प्रगत, पुरोगामी, सत्यशोधक विचारांवर महाराष्ट्राची वाटचाल सुरु असून ती अविरत सुरू राहील. या देशाला एकसंघ ठेवण्यात त्यांचे विचार अतिशय उपयोगी आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.