अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कटिबद्ध. :मंत्री छगन भुजबळ*
*अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी शासन कटिबद्ध*
*:मंत्री छगन भुजबळ*
नाशिक जनमत येवला व निफाड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मंत्री श्री.भुजबळ यांनी पाहणी केली* ढगफुटीसदृश्य झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झालेले आहे. या आस्मानी संकटात शासन शेतकऱ्यांच्या सोबत असून सर्वतोपरी मदतीसाठी सदैव कटिबद्ध आहे, प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आज येवला व निफाड तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपीकांच्या नुकसानीची पाहणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली, यावेळी ते बोलत होते. यावेळी समवेत उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, निफाड तहसीलदार आबा महाजन, निफाड तहसीलदार विशाल नाईकवाडी, गट विकास अधिकारी संदीप वायाळ, गट विकास अधिकारी नम्रता जगताप, येवला तालुका कृषी अधिकारी शुभम बेरड, निफाड तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, मंडळ अधिकारी रूपाली साळवे, ग्राम महसूल अधिकारी भारत नागरे, यांच्यासह अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.
मंत्री श्री भुजबळ म्हणाले की, परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या मका, सोयाबीन, कांदा, द्राक्षबागा, भुईमुग, टोमॅटो, भाजीपाला यासह विविध पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. झालेल्या नुकसानीचे मोहीम स्तरावर पंचनामे करण्यात यावेत. यात एकही बाधित शेतकरी वंचित राहता कामा नये. या कामी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली नाही तेथील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना मंत्री श्री भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्र्यांनी सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याची घोषणा केली आहे. राज्याच्या अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या वतीने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना आवश्यक मदत करण्यात येत आहे. बाधित शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची मदत सुरू करण्यात आली असून प्रत्येकी १० किलो तांदूळ आणि १० किलो गहू अशा स्वरूपात अन्नधान्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. आवश्यक त्या ठिकाणी आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय सेवा देखील पुरविण्यात येत आहे. अतिवृष्टीमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने आरोग्य यंत्रणांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. ‘बळीराजाने धीर धरावा, खचून जाऊ नये’ अशा शब्दात मंत्री छगन भुजबळ यांनी बाधित शेतकऱ्यांना धीर दिला.
येवला तालुक्यातील गवंडगाव, रस्ते सुरेगाव, पिंपळखुटे खुर्द, वाघाळे आणि निफाड तालुक्यातील कोटमगाव व वनसगाव येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पीकांची पाहणीसह मांजरपाडा प्रकल्पाच्या माध्यमातून भरण्यात आलेला डोंगरगाव साठवण तलावाची पाहणी यावेळी मंत्री श्री भुजबळ यांनी केली
’