गोदावरी नदीवरील गांधी तलावात स्नान करताना चार मुले बुडाली; तिघांना वाचविण्यात यश, एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू.

गोदावरी नदीवरील गांधी तलावात स्नान करताना चार मुले बुडाली; तिघांना वाचविण्यात यश, एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू.
नाशिक जनमत शहरातील गोदावरी नदीवरील गांधी तलाव येथे आज सकाळी स्नान करत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चार मुले पाण्यात बुडण्याची दुर्दैवी घटना घडली.
मुंबई येथून सुमारे ४० जणांचा समूह दर्शनासाठी नाशिक येथे आला होता. सकाळी गोदावरी नदीत स्नान केल्यानंतर शिर्डी येथे जाण्याचा त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. त्यानुसार गांधी तलाव परिसरात स्नान करत असताना चार मुले पाण्यात बुडू लागल्याचे निदर्शनास आले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपस्थित जीवरक्षक तसेच नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. या बचावकार्यात तीन मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, गोपाळ गुप्ता, वय १४ वर्षे, या मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिक महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नदीपात्रात अथवा जलाशयात स्नान करताना भाविकांनी व पर्यटकांनी, विशेषतः पालकांनी आपल्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. पाण्याची खोली व पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज नसलेल्या ठिकाणी पाण्यात प्रवेश करू नये.
प्रशासनाने धोकादायक ठिकाणी दिलेल्या सूचना व सुरक्षा नियमांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे.
नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.


