वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यास* *वाहन चालविण्याचा परवाना होऊ शकतो निलंबित*

*वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन झाल्यास*
*वाहन चालविण्याचा परवाना होऊ शकतो निलंबित*
*नाशिक जनमत , दि. ७ केंद्रीय मोटार वाहन नियमात महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार एखाद्या वाहन चालकाने एका वर्षात पाच किंवा अधिक वेळेस वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, तर अशा चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाईल, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक यांनी दिली आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय मोटार वाहन नियमात हे बदल करण्यात आले असून चलन प्रणाली पारदर्शक करण्यात आली आहे. प्रत्यक्ष तसेच इलेक्ट्रॉनिक (ई चलन) पद्धतीने दंड आकारला जाईल. वाहनधारक/वाहन चालकांना चलन भरण्यासाठी किंवा आक्षेप नोंदविण्यासाठी ४५ दिवस मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत कोणतीही कार्यवाही न केल्यास चलन स्वीकारले गेले असे मानले जाईल. तसेच पुढील ३० दिवसांत दंड भरणे बंधनकारक राहील. चलनाला आव्हान द्यावयाचे असल्यास संबंधित पुरावे ४५ दिवसांत ऑनलाइन सादर करावे लागतील. आक्षेप नाकारल्यास पुढील ३० दिवसांत ५० टक्के दंड भरुन न्यायालयात अपील करता येईल. चलन न भरल्यास वाहन मालकांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यात नोंदणी प्रमाणपत्र आणि अनुज्ञप्ती संबंधित सेवा बंद होणे, वाहनांवर नॉट टू बी ट्रान्झ्क्टेड (Not To Be Transacted) अशी नोंद घेणे, वाहन जप्त करण्याची कारवाई यांचा समावेश आहे.
नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. चलन विहित मुदतीत भरून पुढील कारवाई टाळावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

