नाशिकच्या ‘हरित कुंभ’साठी चिमुकल्यांचे पाऊल; महापौरांच्या हस्ते प्लास्टिक संकलन वाहनाचे लोकार्पण.

नाशिकच्या ‘हरित कुंभ’साठी चिमुकल्यांचे पाऊल; महापौरांच्या हस्ते प्लास्टिक संकलन वाहनाचे लोकार्पण
नाशिक : जन्मत ‘प्लास्टिक कचरा मुक्त कुंभ’ आणि ‘अविरल गोदावरी’ या संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्याच्या दृष्टीने नाशिक शहरात राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाला आज महत्त्वपूर्ण टप्पा गाठता आला. शहरातील सुमारे २०० शाळांमधील विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या प्लास्टिक कचऱ्याच्या पुनर्प्रक्रियेसाठी विशेष वाहनाचे लोकार्पण मा. महापौर सौ. हिमगौरी ताई आहेर-आडके यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमास महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त करिष्मा नायर, शिक्षणाधिकारी डॉ. मिता चौधरी, नगरसेविका उषाताई बेंडकोळी, कविता लोखंडे, अंकिता शिंदे तसेच ‘अविरल गोदावरी’चे राजेश पंडित, चंद्रकिशोर पाटील, जगबिर सिंग, मनोज साठे, रोशन केदार, हरित कुंभ मनपा समन्वयक सौ. वैशाली वाघ, मुख्याध्यापिका अनिता जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौरांचा विद्यार्थ्यांशी संवाद
कार्यक्रमादरम्यान महापौर हिमगौरी ताई आहेर-आडके यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. “आपल्या शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी लहान वयातच घेतलेली ही जबाबदारी प्रेरणादायी आहे. तुमच्या या प्रयत्नांमुळे नाशिकच्या हरित मोहिमेला बळ मिळत आहे,” असे त्या म्हणाल्या.
‘जगाला दिशा देणारा उपक्रम’ – राजेश पंडित
‘अविरल गोदावरी’चे राजेश पंडित यांनी उपक्रमाची माहिती देताना सांगितले की, नाशिक महानगरपालिका व समाजातील विविध घटकांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “आजचे हे विद्यार्थी पर्यावरणदूत आगामी कुंभमेळ्यात संपूर्ण जगासमोर पर्यावरण रक्षणाचा आदर्श ठेवतील,” असे त्यांनी नमूद केले.
हरित कुंभची शपथ
कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका कुंदा बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित मान्यवर, शिक्षक व विद्यार्थ्यांनी ‘हरित कुंभ’ची शपथ घेतली. प्लास्टिकचा वापर टाळणे व गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
शहरातील २०० शाळांमधून जमा झालेला सुका प्लास्टिक कचरा आता या विशेष वाहनाद्वारे संकलित करून पुनर्प्रक्रियेसाठी पाठविण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे ‘स्वच्छ नाशिक, हरित नाशिक’ मोहिमेला अधिक गती मिळणार असून आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश दिला जात आहे.



